बहुजननामा ऑनलाइन – भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात मॉस्कोमध्ये चर्चा झाली. मात्र त्याआधी पँगाँग सरोवराच्या उत्तर किनार्याजवळ गोळीबाराची घटना घडली होती. चुशूल सब सेक्टरमध्ये वॉर्निंग शॉटस म्हणजे इशारा देण्यासाठी आधी गोळीबार झाला होता. पण त्यानंतर उत्तर किनार्यावर घडलेली गोळीबाराची ही घटना खूप तीव्र आणि मोठी असल्याचे आता समोर आले आहे.
सरोवराच्या उत्तर किनार्यावरील फिंगर्सवर वर्चस्व मिळवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला. फिंगर तीन आणि फिंगर चारची रिजलाइन जिथे मिळते, त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी 100 ते 200 गोळयांच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या, अशी माहिती अधिकार्याने दिली. सात सप्टेंबरला चुशूल सब-सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबाराबद्दल भारत आणि चीन दोघांनी पत्रक प्रसिद्ध करुन माहिती दिली होती. मुकपरी हाईटस जवळ गोळीबाराची ही घटना घडली होती. 45 वर्षात पहिल्यांदाच जवळ गोळीबार झाल्याचे अधिकार्याने सांगितले. उत्तर किनार्यावरील गोळीबाराच्या या घटनेबद्दल कुठल्याही बाजूने अद्यापपर्यंत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. चुशूलच्या घटनेनंतर हा गोळीबार झाला होता. दोन्ही बाजूच्या कॉर्प्स कमांडरमध्ये बैठक होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीवर तणावाची स्थिती कायम आहे.