बहुजननामा ऑनलाइन टीम – कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्यांनी घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना (ता.६) शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. विजय श्रीराम पवार (वय ५० ) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील गावखोर तांडा मधील शेतकरी विजय श्रीराम पवार यांच्यावर कर्ज होते. नापिकी व अस्मानी संकटामुळे घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने अनेक दिवस कर्जाचा डोंगर वाढत जात होता. यामुळे पवार आर्थिक संकटाच्या विचारात होते. यातूनच त्यांनी घरातील सर्व झोपित असताना पहाटे घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
शनिवार पहाटे घरातील सर्व मंडळी जागे झाले असता ही घटना उघडकीस आली. यानंतर नातेवाईकां धक्का बसला. याबाबत माहिती मिळताच तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवने यांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, पत्नी व आई असा परिवार आहे.