मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत राज्यातील आरोग्य सुविधांवर मोठा ताण यापुढील काळात पडण्याची शक्यता आहे. बेड्स, व्हेंटिलेटर कमी पडू लागले असून ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्युंची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी राज्यात ३ लाख सक्रीय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यु झाले होते. आता २८ मार्च रोजी ३ लाख २५ हजार ९०१ सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्यु वाढू शकतात. यामागे वेळेवर चाचणी न करुन रुग्णालयात भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात, असे टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ नवीन रुग्ण आढळून येत होते. २८ मार्च रोजी एका दिवशी ४० हजार ४१४ नवीन रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बैठकीतील महत्वाचे निर्णय
पहिल्या कोरोना चाचणीत ज्या आरोग्य सुविधा वाढविल्या. त्या आताच्या या संसर्गात सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
* ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा
* पुणे, मुंबईच नाही तर उर्वरित ठिकाणीही सुविधा हवी
* गृह विलगीकरणापेक्षा संस्थात्त्मक विलगीकरणावर भर द्यावा
* मृत्यु पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे़
* प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी
* सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करु द्यावे
* विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत
* मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्यांची कार्यपद्धती, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी जेणे करुन नियोजनबद्ध रितीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.