बहुजननामा ऑनलाइन टीम – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ति शर्मा या तिघांची नावे पाठवली आहेत. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआयकडून चांगली कामगिरी करणार्या खेळाडूंची नावे पाठविली जातात.
रोहित शर्मा 2019 मध्ये वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यासह त्याने इंग्लंडमधील विश्वचषकातील 5 विक्रमी शतकांसह 548 धावा केल्या ज्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा ठरल्या. याशिवाय टी -20 मध्ये 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला, तर कसोटीत दक्षिण आफ्रिका मालिकेत 3 शतकेही ठोकली. शिखर धवनचे नाव पुन्हा एकदा अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. यासोबत भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ वेगवान गोलंदबाज इशांत शर्मा याचंही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू दीप्ती शर्माचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दीप्ती वनडे आणि टी-20 मध्ये शानदार कामगिरी करत आहे.इशांत शर्मा याने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे तर ऑल राउंडर दीप्ती शर्माने यंदा टी-20 वर्ल्ड कप मध्ये भारत संघाला फायनलपर्यत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.