मोहोली : बहुजननामा ऑनलाईन – राजस्थानचे माजी पोलीस महासंचलाक आणि बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी असं मत व्यक्त केलं आहे. याचा सरकारलाच मोठा फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे.
अजितसिंग शेखावत यांच्या मते, “भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची समस्या दूर करण्यासाठी मॅच फिक्सिंगशी संबंधित नियम करण्यात यावेत तसेच क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी. त्यामुळे सरकारचा मोठा फायदा होईल.” मॅच फिक्सिंग संबंधित नियम करण्याची गरज का आहे हेदेखील त्यांनी स्पष्ट करून सांगितले आहे. मॅच फिक्सिंग रोखणे शक्य नाही त्यामुळे त्याच्याशी संबंधित नियम करण्यात यावा. सट्टेबाजीही कायदेशीर करावी त्यामुळे भ्रष्टाचार संपुष्टात येईल असं शेखावत यांनी सुचवलं आहे.
राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसहित 12 खेळाडूंविरोधात गेल्या वर्षभरात भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारी, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली तमिळनाडू प्रीमियर लीग आणि महिला क्रिकेटपटू सट्टेबाजांच्या संपर्कात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शेखावत यांनी सट्टेबाजी कायदेशीर करावी असं सूचवलं आहे. इतकेच नाही तर, हे कायदेशीर झालं तर, कोण सट्टेबाजी करतो आणि किती रकमेची सट्टेबाजी करतो याचीही आकडेवारी सहज मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.