बहुजननामा ऑनलाईन – महाविद्यालयातील सहकारी मानसिक त्रास देतात म्हणून बी. टेकच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. धर्मराज दत्तात्रय इंगळे असे या तरुणाचे नाव असून तो हातकणंगले (तिरसंगी) येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. टेकच्या शेवटच्या वर्षात शिकत होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मराज मुळचा मंगळवेढा तालुक्यातील अकोल्याचा होता. कॉलेजमध्ये त्याचे सहकारी मित्र त्याचा अपमान करतात असे त्याने कुटुंबियांना सांगितले होते. सहकाऱ्यांनी केलेल्या रॅगिंगमुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप धर्मराजच्या कुटुंबियांनी केला आहे. धर्मराज गेल्या चार वर्षापासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. गॅदरिंग नंतर रूम मधील मुलांबरोबर धर्मराजचे काही तरी बिनसले होते, तेंव्हा तो घरी परत आला होता आणि कॉलेजला जायचे नाही असे वारंवार म्हणत होता. बेताच्या परिस्थितीत पालकांनी त्याला शिकवल. मात्र सहकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याने आता त्यांनी कोणाकडे बघायच असा प्रश्न धर्मराजच्या आई वडिलांनी विचारला आहे.
रॅगिंगला त्रासलेल्या धर्मराजने कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याचे कुटुंब त्यांच्यावर लक्ष ठेऊन होते. परंतु घरचे झोपलेले पाहून पहाटेच्या वेळी बागेत फवारन्यासाठी आणलेले विषारी तननाशक प्यायले. उपचारासाठी घेऊन येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मंगळवेढा पोलिसांकडे त्याचा वैद्यकीय अहवाल पाठवण्यात आला असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
धर्मराज अभ्यासात हुशार तर होताच पण हाताशी आलेला तरुण मुलाने आत्महत्या केली. या आत्महत्येला त्याच्या कॉलेजमधील सहकारीच जबाबदार आहेत, असा आरोप इंगळे कुटुंबीयांनी केला आहे. घरातील मुलांमध्ये धर्मराज तसा सगळ्यात हुशार त्यामुळे त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा असताना असे अचानक घडल्याने संपूर्ण कुटूंबावर शोककळा पसरली आहे.