औरंगाबाद : बहुजनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीच्या गर्दी पेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यास दुपटीने गर्दी राहील, असे वक्तव्य स्वतः रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते. मात्र प्रत्यक्षात रविवारी पार पडलेल्या या सभेला गर्दीच जमली नाही. त्यामुळे सभेची वेळ सायंकाळी 4 वाजेची असताना गर्दी जमेल या आशेने तब्बल तीन तास उशिराने आठवले सभा स्थळी आले. एकंदरीत आव्हानच त्यांना पेलावता आले नाही, हे मात्र सभेतील रिकाम्या खुर्च्यांवरून दिसून आले.
जबिंदा लॉन मैदानावर भारिप बहुजन महासंघ, एमआयएमसह इतर विविध पक्षांच्या वंचित बहुजन आघाडीचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात मैदानाबाहेरपर्यंत सारखीच गर्दी होती. संपूर्ण मराठवाड्यातून दलित-मुस्लिम तरुणांनी गर्दी केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या या शक्तिप्रदर्शनावरून अनेक दलित पक्षांनी धसका घेतला होता. यानंतर आठवले यांच्या उपस्थिती एक कार्यक्रम याच मैदानवर घेण्यात आला होता. त्यास अनेक दलित संघटनांनी पाठ फिरवली होती.
वंचित बहुजन आघाडीचा मेळावा हा एकट्या भारिप बहुजन महासंघाचा नव्हता. त्यात एमआयएमसह विविध 28 संघटना होत्या. त्यामुळे मैदानावर मोठी गर्दी झाली होती. मात्र रिपाइंचा मेळावा हा एका संघटनेचा असून ही आमची एकट्याची ताकद आहे, असे सांगून आठवले यांच्यासह रिपाइंच्या सर्वच पदाधिकार्यांनी स्वतःलाच सावरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
या मेळाव्यासाठी तब्बल महिनाभरापासून रिपाइंचे नेते मंडळी गर्दी जमाविण्यासाठी प्रयत्नात होते. मात्र प्रत्यक्षात सभा स्थळी संपूर्ण मैदानावर खुर्च्या ठेवूनही अर्ध्या रिकाम्या राहिल्या यावरून औरंगाबादकर आठवलेंवर नाराज आहेत यावरून दिसते.