बहुजननामा ऑनलाइन टीम – शेतकऱ्यांना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडत आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यावर पलटवार करताना भाजप नेते नीलेश(Nilesh Rane) यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. नकलीपणा काय असतो बघायचे असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
राणे यांनी ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला असून, यामध्ये कंत्राटी शेतीचे फायदे सांगितले आहेत. बारामती अॅग्रोचा हा फ्लेक्स असून, त्यात करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे, वर्षभर हमी भावाने खरेदी, शेतकऱ्याला क्रेडिटवर बेबीकॉर्न बियाणे आणि मिरचीच्या रोपांची पुरवठा, शून्य टक्के वाहतूक, विविध पिकांसाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, असे काही मुद्दे यात मांडण्यात आले आहेत.
कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीअखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.