नवी दिल्ली : वृतसंस्था – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव निश्चित झाले आहे. महाराष्ट्र टाइम्स वृत्तसंकेत स्थळाने या बाबदचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. जर अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर ओबीस समाजातील नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळेल.
लोकसभेतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र पक्षातील जेष्ठ नेत्यांनी त्यांना राजीनामा न देण्याबाबद सल्ला दिला होता. काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीने देखील त्यांचा राजीनामा नाकारला होता. तरी देखील राहुल गांधी आपल्या राजीनामावर ठाम होते. त्यांनीच नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सुचना केली होती. त्यामुळे आता गांधी परिवाराबाहेरील व्य़क्ती काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यानुसार जर गेहलोत नवे अध्यक्ष झाले तर तब्बल 20 वर्षानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी गांधी परिवाराबाहेरील व्यक्ती विराजमान होईल.
गेहलोत यांनी तीनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे तर पाचवेळा ते खासदार राहिले आहेत. राजकारणाचा आणि संघटनात्मक कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. २०१७ मध्ये गुजरात निवडणुकांच्या वेळी संघटनात्मक पातळीवर गेहलोत यांनी मोठं काम केलं होतं. ते मागास समाजातील असून काँग्रेसला दलित, ओबीसी समाजाशी पुन्हा जोडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेऊनच गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते आहे. नव्या अध्यक्षांसोबत तीन कार्यकारी अध्यक्षही असणार आहेत.