नाशिक बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आता घुमजाव केले आहे. ती टीका राजकिय होती असं म्हणत राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक येथे कॉंग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलले. आगामी निवडणूकीत समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा निर्णय कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झाला आहे. राज्यात वंचित बूहुजन आघाडीने कॉंग्रेस सोबत यावं असा आमचा मानस आहे. तो आधीही होता. मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे नेते काय भुमिका घेतात हे पाहायला हवं असं अशोक चव्हाण म्हणाले.
त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटले होते. ती त्यावेळची राजकिय टीका होती. येणारी निवडणूक कॉंग्रेससाठी महत्वाची आहे. त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडील सोबत घेण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. माणिकराव ठाकरे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले. कॉंग्रेसला लोकसभा निवडणूकीत दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी वंचितचा फटका कॉंग्रेसला बसला. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी वंचितला भाजपची बी टीम असल्याचे वक्तव्य केले होते.