बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देखील साध्या पद्धतीनं साजरी करा अशा सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत. ठाकरे सरकारनं शिवजयंती साजरी करण्यासंबंधित काही गाईडलाईन्सही जाहीर केल्या आहेत. यानुसार, बाईक रॅली, प्रभात फेरी, पोवाडे अशा सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी यावरून आता सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारला तुम्ही पेंग्विन पाहिलेले चालतील परंतु शिवजयंती मात्र नको असं ते म्हणाले आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार लिहितात, भायखळ्याला 16 फेब्रुवारी पासून पेंग्विन पहायला यायचं हं. सरकारचं असंच आमंत्रण आलंय बरं का. परंतु खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळं सांभाळा. अजब वाटले तरी नियम पाळा. ठाकरे सरकार करेल तेच नियम आणि तेच कायदे.
भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं!
सरकारचं असं आमंत्रण आलय बर का!पण खबरदार जर
जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..
असे सरकारचे आदेश पण आलेत.त्यामुळे सांभाळा!
अजब वाटले तरी नियम पाळा!!
ठाकरे सरकार करेल,
तेच नियम आणि तेच कायदे!!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 12, 2021
कोरोनामुळं बंद करण्यात आलेले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, ज्याला भायखळा प्राणी संग्रहालय म्हणून ओळखलं जातं ते आता राज्य सरकारच्या मिनश बिगेन अगेन अंतर्गत 15 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून आशिष शेलारांनी टीका केली आहे.
आमदार राम कदम यांनीही एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का असा प्रश्न करत शिवसेनेवर टीका केली.