नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीतील अनाज मंडीमध्ये लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत ४३ लोकांचा मृत्यू झाला असून अद्याप २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच,५९ लोकांची सुटका करण्यात आली आहे, तरी मृतांची संख्या वाढू शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे घटनेची माहिती घेण्यासाठी फिल्मिस्तानमध्ये पोहोचले असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच जखमींसाठी एक लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. “मी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असून सात दिवसात अहवाल देण्यास सांगितले असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.
घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई :
दिल्लीचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री इमरान हुसेन यांनी रविवारी सांगितले की, धान्य बाजाराच्या परिसरातील कारखान्यात लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास केला जाईल आणि त्यासंबंधितांवर कारवाई केली जाईल, असे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सांगितले.
दिल्लीतील सर्वात मोठे बचाव अभियान :
या आगीत जखमींवर हिंदूराव रुग्णालय, आरएमएल, लेडी हार्डिंग आणि एलएनजेपी येथे उपचार सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिशवी बनविण्याच्या कारखान्यात भीषण आगीत ही घटना घडली. अद्याप आगीचे कारण कळू शकले नाही. असं म्हणतात की बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला होता. अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे की दिल्लीतील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे बचाव अभियान सुरु आहे.
दरम्यान, आगीत जखमी व्यक्तींना उपचारासाठी एलएनजेपी येथे आणण्यात आले आहे. दरम्यान, अरुंद रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, जी इमारत पेटली होती, ती यामिनच्या नावावर आहे. त्यात अनेक कारखाने चालतात. त्यांच्यात काम करणारे मजूर या घरात झोपायचे. ही पाच मजली इमारत आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही आग लागली.