बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्त संस्था – जम्मू काश्मीरमध्ये कलम 370(Article 370) पुन्हा लागू करण्यात यावे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी केलेल्या आघाडीलाही त्यांनी पाठिंबा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370(Article 370) लागू करून 5 ऑगस्ट 2019 पूर्वीची स्थिती बहाल करावी, अशी मागणी काश्मिरी पक्षांनी केली असून यासाठी अनेक पक्ष एकत्र आले आहेत.
यासंदर्भात पी. चिदंबरम म्हणाले, केंद्र सरकारने मुख्य प्रवाहातील पक्ष आणि आणि जम्मू काश्मीरमधील जनतेकडे ते देशविरोधी असल्याच्या नजरेने पाहणे बंद करावे. काँग्रेस जम्मू काश्मीरमील जनतेचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजे.
केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे, असे चिदंबरम म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी येथील प्रमुख पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. गुरुवारी या प्रमुख पक्षाच्या प्रमुखांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा महेबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फ्रन्सचे सज्जाद लोन, पीपल्स मुव्हमेंटचे नेते जावेद मीर आणि माकपाचे नेते मोहम्मद युसूप तारिगामी हे उपस्थित होते.
बैठकीत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी काश्मिरी पक्षांनी एका आघाडीची घोषणा केली आहे. ही आघाडी कलम 370 च्या मागणीसांठी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा करणार आहे.