मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पदावरून उचलबांगडी झाल्याच्या नाराजीतून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असे म्हटले आहे. यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, परमबीर सिंग यांना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांना अटक करा
अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, परमबीर सिंग यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जनतेसमोर खुलासा करून सर्व प्रश्नांना उत्तरे द्यावीत. अन्यथा मुख्यमंत्री यामध्ये सहभागी असल्याचा संशय जनतेच्या मनात येईल, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
वाझे हे लादेन आहेत का? असा सवाल करत त्यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जनतेसमोर येऊन दरमहा १०० कोटीच्या वसुलीचा खुलासा करावा. वाझे हा ठाकरे सरकारचा वसुली अधिकारी असल्याचा मा. @Dev_Fadnavis यांचा आरोप आता सिद्ध झाला आहे. pic.twitter.com/KKXu3oxI5y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2021
दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले, मात्र देशमुख यांना हे आदेश कुणी दिले, हेदेखील आता परमबीर सिंग यांनी सांगावे. सचिन वाझे यांना सेवेत परत आणणार्यांनी हे आदेश दिले का, अशी शंका भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील सरकार खंडणीखोरांचे : उपाध्ये
दरम्यान, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी परमबीर सिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका केली आहे. त्यांनी म्हटले की, गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचे टार्गेट दिले होते, असे परमबीर सिंग यांचे पत्र गंभीर आणि धक्कादायक आहे. राज्यातील सरकार खंडणीखोरांचे, गुन्हेगारांचे आहे हे सिद्ध करण्याचा यांनी विडाच उचलला आहे. अनिल देशमुख यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुखांना काढायला हवे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.
गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होत, परमवीर सिॅग यांचे धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिध्द करण्याच विडाच उचलला आहे. @AnilDeshmukhNCP यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा @OfficeofUT यांनी त्यांना काढायला हवे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 20, 2021