बहुजननामा ऑनलाइन टीम – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत ( BJP was hurt)होणार आहे. महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, ही निवडणूक भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाला मंगळवारी राम राम ठोकला, तर पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे घटकपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली.
दुसरीकडे भाजप शिवसंग्रामला विचारात घेत नसून पक्षाच्या काही नेत्यांना औरंगाबाद पदवीधरमधून उमेदवार पाडायचा आहे का, असा सवाल विचारात शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, येणाऱ्या २५ तारखेपर्यंत शिवसंग्रामला विचारात न घेतल्यास स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशाराही मेटे यांनी दिला. दरम्यान, आधीच बंडखोरीचे ग्रहण त्यात आता मित्रपक्षाच्या नाराजीचा सामना भाजपला करावा लागणार आहे.
जयसिंगराव गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज मागे
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. मंगळवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्याचबरोबर भाजपला सोडचिठ्ठीही दिली. गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमे दवाराचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे.