बहुजननामा ऑनलाइन टीम – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नंतर भाजप नेत्यांनी अण्णांची मनधरणी केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यावरुन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी अण्णांना सल्ला देत, ‘अण्णा हजारे यांनी निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे,’ असे वक्तव्य केले आहे.
रघुनाथदादा पाटील सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी दिल्लीत रामलीला मैदानावर अण्णांनी मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला काही प्रमाणात यश सुद्धा मिळाले होते. मात्र, आता अण्णा हजारेंच वय झाले आहे.
एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळवलं की त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काही अर्थ नाही. अण्णा हजारेंच वय लक्षात घेता त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांत जगावे, असा सल्ला रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.
अर्थसंकल्पावर शेतकरी आंदोलनाची छाप
केंद्राचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशजनक असल्याची टीका करत पाटील म्हणाले, आजच्या अर्थसंकल्पावर शेतकरी आंदोलनाची छाप दिसून येत असून, आंदोलनाचा दबावही होता. धान खरेदीसाठी, सिंचन योजनेसाठी नगण्य तरतूद असल्याने शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत करण्यात आली आहे, ती शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखी असल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारने नोटा छापण्याऐवजी आर्थिक परिस्थिती सुधारावी, असा टोलाही रघुनाथ दादा पाटील यांनी अर्थसंकल्पावरुन लगावला आहे.