अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – हैद्राबाद येथे झालेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष निर्भया केसमधील आरोपींच्या दिशेने वळाले होते. अत्याचाराच्या घटनांमुळे चिंतातूर झालेल्या अण्णा हजारे आजपासून राळेगणसिद्धी येथे मौन धारण करणार आहेत. अण्णांनी गेल्या ९ डिसेंबरला पंतप्रधान मोदी आणि १० डिसेंबरला राष्ट्रपती कोविंद यांना पत्र पाठवून निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली होती. अन्यथा आपण मौनव्रत धारण करू आणि पुढे जाऊन उपोषण आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे अण्णांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपण राळेगणसिद्धी या आपल्या गावी मौनव्रत धारण करणार असल्याचे जाहीर केले होते.
नेमकं काय म्हंटलंय अण्णा हजारेंनी प्रसिद्ध पत्रकात
दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, देशात फास्ट ट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत, न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत.
बलात्कार आणि हत्या प्रकरणात २०१४ ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर ४२६ प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगयाविना पडून आहे, हेल्पलाईन नंबर १०९१ काम करत नाही, २०१२ पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे. दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैद्राबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रोत्साहीत करणारा ठरत असल्याचे म्हटले आहे.
Visit : bahujannama.com