अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. अनेकांनी त्यांची पाठराखण केली आहे. आता यामध्ये अण्णा हजारे यांनी शरद पवार यांची पाठराखण केली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकारणात शरद पवारांचे नाव कसं आलं मला माहीत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. असं म्हणत अण्णा हजारे यांनी शरद पवारांना क्लीन चिट दिली आहे.
अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकारणात शरद पवारांचे नाव कसं आलं मला माहीत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी. जे दोषी नाहीत, त्यांना विनाकारण अडकवू नये. मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचं नाव नाही. पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. माझ्याकडं शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे. जे सत्य आहे ते सत्यच, खोटे आरोप करणे चुकीचे आहे, असंही हजारे म्हणाले.
‘माझ्याकडं आलेल्या पुराव्यानुसार शरद पवार यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही. परंतु अजित पवार यांचे या प्रकरणात नाव आहे. ईडीनं शरद पवार यांचं नाव कसं काय घेतलं हे चौकशीत पुढे येईल. सहकारी कारखाण्यासाठी बँकेतून करोडो रुपयांचे कर्ज घेतले गेले. मात्र त्यानंतर कारखान्यांनी बँकांना पैसे परत दिले नाही. त्यामुळं बँकांनी कारखान्यांवर जप्ती आणली व बँकेनं कवडीमोल भावानं ते कारखाने विकले. यामध्ये आपल्याला शंका असून हे कारखाने आजारी पडले कि पाडले असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.
Visit : bahujannama.com