जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – गेली चार वर्ष माझ्या विरोधात षडयंत्र रचून मला छळण्यात आलं. पक्षावर माझा रोष नाही,मात्र माझ्याविरुद्ध कट रचणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्याची आपली मागणी असून ती चार ते पाच नावे आपण नेतृत्वाकडे दिली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर अन्यथा आपण पक्षांतर करण्याचा इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला. एकनाथराव खडसे यांनी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते जळगावात परतले. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलले कि पक्षावर माझी नाराजी नाही, मात्र कट रचणाऱ्यांवर कारवाईची माझी मागणी कायम आहे.माझ्यावर आरोप करणे, चौकशी लावणे, असे प्रकार त्यांनी केले आहेत. त्या लोकांविरुद्ध मी तक्रार केली आहे त्यांची नावेही तक्रारीत दिली आहेत आणि त्यांच्या संदर्भातील पुरावेसुध्दा दिले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच अपेक्षा आहे. ज्यांच्यावर माझा रोष आहे, त्यांच्यासोबत मी काम कसे करणार ? संबंधित लोकांवर कारवाई झाली नाहीतर मी पक्षांतर करेन.
माझ्या समर्थकांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांचा माझ्यावर पक्षांतराचा मोठा दबाव आहे, असेही खडसे यावेळी स्पष्ट केले. ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, अशा अन्य नेत्यांना पक्षात प्रवेश मिळतो.त्यांना पक्षात महत्वाचे स्थान देखील दिले जाते. इतर पक्षातील नेत्यांना पायघड्या टाकल्या जात असताना मला डावलण्याचे कारण काय ? असा प्रश्नही खडसे यांनी उपस्थित केला.दरम्यान, आपण कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी अजुनही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे खडसे यांच्या भूमीकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मंत्री पदाचा राजीनामा देणे,विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारणे,मुलगी अॅड. रोहिणी खडसे यांचा पक्षातीलच हितशत्रूंकडून झालेला पराभव,पक्षाच्या कार्यक्रमात डावलणे अश्या अनेक कारणामुळे भाजपकडून सतत अन्याय व अपमानाची वागणूक मिळत असल्याने खडसे यांनी अनेक वेळा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर गोपीनाथ गडावर पक्षांतराबाबत ‘माझा काही भरोसा नाही’, असे म्हणणारे एकनाथराव खडसे हे शिवसेनेत जाणार कि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी वृत्ते समोर येत आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या वाढीमध्ये सिंहाचा वाट उचलणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यावर खरोखरच अन्याय होत असल्याचे समर्थक आणि कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे कि एकनाथ खडसे जो काही निर्णय घेतील, तो विचारपूर्वकच घेतील. अधिवेशन काळात खडसे तिकडे असल्याने ते काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Visit : bahujannama.com