नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येनंतर आंध्रप्रदेशात महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्कार पीडितेला तातडीने न्याय देण्यासाठी आरोपी सिद्ध झाल्यास आरोपीला २१ दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली. एफआयआर दाखल केल्यानंतर २१ दिवसांमध्ये ट्रायल पूर्ण करून फाशीची शिक्षाही देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ मध्ये दुरूस्ती करून नवं ३५४ (ई) हे कलम तयार करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आता हे विधेयक मांडण्यात येणार आहे. याला ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’ असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोप सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात येणार आहे.
काय आहे ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’
७ दिवसांमध्ये तपास आणि १४ दिवसांमध्ये न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसंच या २१ दिवसांमध्ये आरोपीला शिक्षाही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो. या प्रकरणासाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ, अॅसिड हल्ले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर, बालकांवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.
Visit : bahujannama.com