नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कलम ३७० आणि कलम ३५ अ या मुद्यावरून राजकीय चर्चा सुरु आहे या पार्श्वभूमीवर पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेषाधिकारचे कलम रद्द झाल्यास २०२० पर्यंत जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करू, असे त्यांनी म्हंटले आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदार संघातून मुफ्ती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुफ्ती म्हणाल्या की , विद्यमान मोदी सरकार जर कलम ३७० आणि कलम ३५ अ नष्ट करण्यासाठी डेडलाईन देत असतील. तर आम्हीही जम्मू-काश्मीरला वेगळे करण्यासाठी एक डेडलाईन देतो. केंद्र सरकारने कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द केले तर जम्मू-काश्मीर आणि भारतातील नाते संपुष्टात येईल. जम्मू-काश्मीरसाठी कलम ३७० एका पुलासारखे आहे तोच पूल जर तुम्ही नष्ट केला तर गंभीर परिणाम होतील, असे त्यांनी सांगितले.