मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेससोबत आघाडी कऱण्यासाठी बैठकी होत आहेत. मात्र त्यातून युतीबाबत काही निर्णय होत नाहीय. त्यामुळे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी त्यावर कार्यकर्त्यांना थोडी कळ काढण्यासाठी सांगितलं आहे. आजवर एका बैठकीत कोणत्या पक्षाची आघाडी किंवा युती झाली आहे का?. त्यामुळे थोडा धीर धरा. वंचित बहुजन आघाडीची देखील समविचारी काँग्रेस आघाडीशी निवडणुकीत आघाडी होईल, असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं. मालेगाव येथे रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात आनंदराज आंबेडकरांना, काँग्रेस पक्षाशी आघाडीची चर्चा फिस्कटली का?, हा प्रश्न केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी मुंबईत आघाडीबाबत चर्चा झाली. ती पहिल्या टप्प्यातील चर्चा आहे. त्यावर लगेचच निष्कर्ष काढणे योग्य नाही. कारण एकाच बैठकीत आजवर कोणत्याच राजकीय पक्षांची आघाडी किंवा जागावाटप झालेले नाही. येत्या निवडणुकीत ही आघाडी आकारास येईल, असा मला विश्वास वाटतो, असा दावा त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, भारतीय संविधानामुळे देशाची सामाजिक एकात्मता अबाधित राहिली आहे. त्यामुळेच भारताची एक वेगळी ओळख जगभर आहे. हेच संविधान काही अमानवी शक्तींना नकोसे झाले आहे. त्यांच्याकडून राज्यघटनेच्या मुळ चौकटीवरच घाला घालण्याचे प्रयत्न देशभर सुरू आहेत. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे ही भारतीय नागरिक म्हणून आपली व प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणूक खुप महत्वाची आहे, असंही त्यांनी यावेळी नमुद केले.