नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात ओबीसीं प्रवर्गात सर्वाधिक जातींचा समावेश असून या प्रवर्गातील लोकसंख्याही अधिक आहे. ओबीसीं विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगात (यूपीएससी) टक्केवारी वाढावी, म्हणून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांनाही बार्टी (BARTI)आणि सारथी (SARTHI) च्या धर्तीवर सुसज्ज संस्था असावी यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील काही युवकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या एका शिष्ट मंडळाने त्यांना निवेदन सादर केले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या या संस्थेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गडकरी यांनी म्हंटले आहे. ओबीसीं प्रवर्गात जवळपास १.५ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आर्थिक सहकार्याची गरज आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने या प्रवर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. ‘सारथी’च्या धर्तीवर ओबीसीं प्रवर्गासाठी समांतर संस्था निर्माण करा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले,खासदार इम्तियाज जलील, खासदार नवनीत कौर राणा यांच्याकडेही याबाबत निवेदन देण्यात आले आहे. राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.