पुणे : बहुजननामा ऑनलाईन- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भगव्या झेंड्याखाली आता हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याचे पक्षाच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी जाहीर केले. भाजपा सरकारच्या नागरिकत्व कायद्यालाही राज ठाकरे यांनी पाठींबा दर्शवत अनुकुलता दर्शवली. यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काल भाजपा प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील तसेच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आगामी भाजपा-मनसे युतीचे संकेतही दिले. आता राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही कौतूक केले आहे. मात्र, हे कौतूक करताना त्यांनी शिवसेनालाही पुन्हा एकदा चिमटा काढला आहे.
शिवसैनिकाला खर्या नेत्याची गरज
अमृता फडणवीस म्हणाल्या, राज ठाकरे हे आपल्या पक्षाला नवीन दिशा देत आहे. हे पाहून मला कौतुक वाटतं. ते खूप चांगलं काम करतील. माझ्या सारख्या शिवसैनिकाला खर्या नेत्याची गरज आहे. ज्या नेत्याला आपण सगळे फॉलो करण्याची गरज असते, त्यामुळे आता आपल्याला खर्या नेत्याची खूप गरज आहे, असे म्हणत अमृता यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे.
पवारांच्या सुरक्षेबाबत म्हणाल्या…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा काढून घेण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असेल. यामध्ये काही तथ्यही नसेल असे वाटते.
मुंबईत महिला सुरक्षित
तर आदित्य ठाकरेंच्या मुंबई नाईट लाईफबाबत त्या म्हणाल्या, मुंबईतील नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही. यात सुरक्षा कशी घेतली जाईल, याबद्दल विचार करावा लागेल. परंतु, मुंबईत महिला सर्वात सुरक्षित आहेत. अनेक महिला काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षितेचा अभिमान आहे.
फोन टॅप प्रकरण अफवा असू शकते
शरद पवार आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचा प्रकार फडणवीस सरकारच्या काळात घडल्याच्या प्रकरणाबाबत विचारले असता अमृता म्हणाल्या, मुळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपाला बाजूला हटवायचे होते. त्यासाठी ते एकत्र आहेत. ज्यावेळी फोन टॅप केले गेले, तेव्हा शिवसेनाही भाजपसोबत होती. मग चौकशी केली पाहिजे. त्यामुळे या प्रकरणामध्ये काही तथ्य आहे का ? की अफवा आहे, हे पाहावे लागेल, असे त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस हे लोकनेते
आता देवेंद्र फडणवीस कुटुंबासाठी वेळ देतात का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. ते मुख्यमंत्रिपदी असतानाही लोकनेते होते, त्यावेळी त्यांना राज्य प्रथम होते. आता ते विरोधी पक्षनेते असले तरी ते लोकनेते आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला वेळ दिला किंवा नाही दिला तरी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत.
Visit : bahujannama.com