बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता ही रामदास आठवले तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना कदापी पाठिंबा देणार नाहीत, असा दावा काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर उपस्थित होते.
दलित मते ही केवळ प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या पाठीशी नाहीत, तर देशात अनेक दलित संघटना आहेत त्यांच्या पाठीशीही ही मते आहेत.तसेच आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांची सध्याची राजकीय भूमिका हास्यास्पद असून, ती आंबेडकरी जनतेला मान्य नाही.
आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक निर्णायक असून नरेंद्र मोदी एक बाजूला तर मोदींच्या विरोधात देशातील सर्व पक्ष एका बाजूला अशी परिस्थिती सध्या आहे . या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात सर्व ४८जागी उमेदवार उभे केलेले आहेत.ते केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार यांचा पराभव व्हावा किंवा या आघाडीची मते कमी व्हावीत, यासाठी उभे करण्यात आले आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या ४८ उमेदवारातून केवळ प्रकाश आंबेडकर सोडले तर कोणीही निवडून येण्याची अजिबात शक्यता वाटत नाही, असा टोला मुणगेकर यांनी लगावला.