बहुजननामा ऑनलाईन टीम – ‘युती नकोच हि कारकर्त्यांची भावना ठीक होती, जे झाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, आता यापुढे युती होणार नाही. युतीमुळे पक्षाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे आता २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. शनिवारी भाजप पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक झाली. या वेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढील काळात युती नकोच, असा सूर धरला तर काही कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी शिवसेनेशी हात मिळवणी करा, अशी मागणी उचलून धरली आहे. मात्र यावेळी दानवे यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात बोलणे टाळले.
रावसाहेब दानवे म्हणाले, माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविल्या असत्या तर नऊपैकी आठ जागा जिंकल्या असत्या, परंतु युती केल्यामुळे पाकसाचे नुकसान झाले, आणि त्यात पक्षाच्या नेत्यांनी नांदेडकडे दुर्लक्ष केल्याने मावळता काँग्रेस पक्ष पुन्हा वर आला. ह्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर लढण्याची चांगली संधी होती, मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता युती करावी लागली. मात्र गरज संपली की हे सोडून जातात. त्यामुळे आता युती नको, ही कार्यकर्त्यांची भावना ठीक आहे. यामध्ये पुढे काय निर्णय होईल माहित नाही, मात्र २०२४ साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. त्यामुळे पुढे युती होणार नाही, असा इशारा दानवे यांनी दिला.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगावकर, तुषार राठोड, बापूसाहेब गोरठेकर, डॉ. धनाजीराव देशमुख, गंगाराम ठक्करवाड, गंगाधर जोशी, अॅड. चतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची हजेरी लावली होती.
‘तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहेत. पण सरकार बनवणे इतके सोपे नाही. यातील दोन पक्ष विरुद्ध टोकाचे आहेत. शिवसेनेने जनमताचा आदर करायला हवा, कारण जनमताचा आदर न करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे म्हणत दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सत्तास्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन केला, परंतु त्यांनी तो उचलला नाही आणि मुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरून बसले. मुख्यमंत्रिपदासाठीचा कोणताही शब्द त्यांना भाजपकडून देण्यात आला नव्हता, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.