मुंबई : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने झाले आहेत. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यानंतर निकालानंतर निर्माण झालेले राजकीय नाटक अभूतपूर्व स्थिती, त्यानंतर लागू झालेली राष्ट्रपती राजवट, ८० तासांच भाजपच सरकार आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सरशी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. या सर्वांचा फटका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बसला आहे. आमदार देखील यातून वाचू शकले नाहीत. विधानसभेतील सर्वच्या सर्व २८८ आमदार सध्या तरी बिनपगारी आणि फुल्ल अधिकारी असल्याची स्थिती आहे.
धर्माबाद येथील आरटीआय कार्यकर्ते डॉ. एस.एस. जाधव यांनी मागवलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले. त्यांनी माहितीच्या अधिकारात 288 आमदारांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेले भत्ते आणि पगार या संदर्भात माहिती मागवली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे वेतन आणि भत्त्यापासून आमदार वंचित आहेत. मात्र शिवसेना आणि भाजपची मैत्री तुटल्याने एक महिना सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आमदारांचा शपथविधी होऊ शकला नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आमदारांचा शपथविधी झाला आहे. मात्र त्यांना अद्याप वेतन आणि भत्ते मिळाले नसून आमदार स्वखर्चातून कामं करत आहेत.