मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणानंतर राठोड गायब झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. संजय राठोड गायब नसून आजच मी त्यांना फोन करुन यवतमाळच्या कोरोना परिस्थितीबाबत चर्चा केली, असा खुलासा पवार यांनी केला आहे.
यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे या 3 जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार आहे. आजच माझं लॉकडाऊनसंदर्भात संजय राठोड यांच्याशी फोनवरुन बोलणे झाले आहे. त्याठिकाणची परिस्थीत गंभीर बनत आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल, असे त्यांच्या कानावर घातल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनसंदर्भात या तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी अजित पवारांनी आज फोनवरुन चर्चा केली आहे. दरम्यान संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आहेत. यावेळी पूजाच्या आत्महत्येप्रकरणी अरुण राठोडला ताब्यात घेतले आहे का ? असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, काही जणांना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. मी काही पोलिसांसोबत संपर्क साधला नाही, असे ते म्हणाले.