मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राजकीय वर्तुळत एकच चर्चा चालू होती ती म्हणजे नेमस्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देधडक – बेधडक अजितदादांचं सूत जुळेल का ? पण आता हळूहळू यासर्व प्रश्नांची उत्तर मिळताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात अजित पवारांनी एकाच वाक्यात ठाकरे पिता-पुत्राची, अर्थात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची विकेट काढल्याचं पाहायला मिळालं आणि ‘दादां’ना ‘काकां’ नी उपमुख्यमंत्रिपदाचं बक्षीस का दिलं असेल, याचा अंदाज आला.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून नुसता कामांचा धडाकाच लावला आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर सरकारची भूमिका मांडताना तेच दिसताहेत. मग तो इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय असो, पुणे मेट्रोचा असो, बारामतीतील गॅसपुरवठ्याचा असो किंवा साईबाबा जन्मस्थळावरून पेटलेल्या वादाचा, अजित पवारांचे ‘बाईट’ माध्यमांमध्ये झळकत आहेत. त्यामुळे अजित पवार राज्याची धुरा सांभाळताना दिसत आहेत.
किस्सा स्टेपनीचा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख गमतीनं ‘स्टेपनी’ असा केला. त्यानंतर अनेकजणांनी याबद्दल आक्षेप नोंदवला. एव्हढेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखिल ‘ अजित पवारांची ‘पॉवर’ आणि प्रशासनावर असलेली पकड पाहून, आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडेच असल्याचं उद्धव ठाकरे यांनी बारामतीत म्हटलं’. मुख्यमंत्री त्यांच्या शैलीत बोलले पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ सरळ होता.
विषय श्वेतपत्रिकांचा
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा झाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आर्थिक शिस्त बिघडल्याचा दावा करत, आमचं सरकार गेल्या पाच वर्षांतील आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका काढणार असल्याचं माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर, जे काही आहे आणि होते ते श्वेतपत्रिकेत येईलच, असं उद्धव ठाकरेही म्हणाले होते. परंतु, अर्थमंत्री अजित पवार यांनी श्वेतपत्रिकेचा हा विषय गुंडाळूनच टाकलाय. आपल्यापुढे इतर महत्त्वाचे विषय असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं.
पुण्यातील नाईट लाईफचा प्रश्न
अगदी हेच उत्तर अजित पवारांनी पुण्यातील नाईटलाईफबाबतच्या प्रश्नावरही दिलं. मुंबईप्रमाणेच पुण्यात नाईटलाईफला परवानगी देणार का, असा प्रश्न त्यांना पालकमंत्री या नात्याने विचारण्यात आला होता. त्यावर, सध्या या प्रस्तावापेक्षा आमच्याकडे महत्त्वाची कामं आहेत, असं म्हणत त्यांनी या विषयाची फाईलही बंदच करून टाकली. दुसरीकडे, राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हेही मुंबईतील नाईटलाईफच्या अंमलबजावणी फारसे सकारात्मक नाहीत. पोलिसांवरचा ताण आणि मनुष्यबळाचा मुद्दा मांडत त्यांनीही हा विषय लांबणीवर टाकण्याचाच प्रयत्न केला आहे. अर्थात, आदित्य ठाकरेंच्या फोननंतर त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचं समजतं.
श्वेतपत्रिकांचा प्रश्न असो किंवा मग पुण्यतील नाईट लाईफचा प्रश्न असो या दोन्ही विषयांच्या बाबतीत यापेक्षा इतर महत्वाचे प्रश्न आपल्यापुढे आहे असे स्पष्टपणे सांगून एकसारखाच चेंडू टाकत सीनिअर अन् ज्युनिअर ठाकरेंची विकेट अजित पवारांनी घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.