बारामती : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे बारामती येथील बैठकीत बोलत होते. तेव्हा त्यांनी बोलताना खतांच्या किमती वाढायला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हटले तर स्फुरद आणि पालाशच्या किमती वाढल्याने युरियाकडे वळू नये. केंद्र सरकारला आमचं आवाहन आहे की, खतांच्या किमती कमी कराव्यात. शेतकऱ्यांनी अन्य प्रकारची खते वापरावी, असे आवाहन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
तसेच पुढे माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, बारामतीत व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त आहे. तीच परिस्थिती पुणे, पिंपरी चिंचवड ग्रामीण मध्ये झाली आहे. परीस्थिती बऱ्याच अंशी बदलत आहे. परंतु, कोरोना नियमावलीचे सर्वांनी भान ठेवणे आवश्यक आहे, तरच कोरोनाला अटकाव घालण्यात यश येणार आहे. पुढे अजित पवार यांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुढे अजित पवार म्हणाले, मधल्या काळामध्ये जेवढा रेमडेसिविर इंन्जेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता, तेवढा आता जाणवत नाही. जेवढी लस पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला लस मिळत नाही. तसेच, भारत बायोटेकला जागा उपलब्ध करून दिली आहे. या लसीला प्रारंभ होणार आहे.. एकदा लस मोठया प्रमाणात उपलब्ध झाली की मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करता येणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केले आहे.
या दरम्यान, म्युकर मायकोसिस अर्थात बुरशीजन्य हा आजारपूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने आढळला नव्हता. आज प्रांताधिकाऱ्यांना याबाबत खासगी डॉक्टरांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातील इंजेक्शनचा तुटवडा आहे.मुंबईला गेल्यावर याबाबत सचिवांसह इतरांबरोबर बैठक घेण्यात येईल.त्यानंतर आवश्यक पुरवठा सुरळीत करण्यात येईल.यावरील उपचाराचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अंतर्भाव केला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.