अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – येथून पुढे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवड व्हावी. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक होऊ नये, असे महाविकास आघाडी सरकाने ठरवले असून यासाठी लवकरात लवकर अध्यादेश आणला जाणार आहे, अशी माहिती अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सोमवारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, निलेश लंके, आशुतोष काळे, बबनराव पाचपुते, डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदी उपस्थित होते. यावेळी मुश्रीफ यांनी सरपंचाच्या निवडीबाबतच्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, जनतेमधून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आहेत.
सरंपच व नगरपालिका अध्यक्ष यांची थेट निवड करण्याबाबतचा ठराव जेव्हा तत्कालिन ग्रामविकास मंत्र्यांनी मांडला होता, तेव्हा मी त्यास विरोध केला होता. अशी निवड रद्द करण्याची मागणी आजही विधिमंडळ सदस्य करत आहेत. अनेकदा एका विचाराचा सरपंच निवडून येतो व सदस्य वेगळ्याच विचाराचे असतात. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होतो. या करता सरपंचाची निवडणूक सदस्यांमधून व्हावी, यासाठी अध्यादेश काढण्यात येईल, असे मुश्रीफ म्हणाले.
भाजपकडून शिवसेनेचा विश्वासघात
भाजपाने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचे कबुल केले होते. जर भाजपाने ठरल्याप्रमाणे शिवसेनेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद दिले असते तर महाविकास आघाडीचा विषय झालाच नसता. भाजपने केलेल्या विश्वासघातामुळेच हा सर्व घोटाळा झाला, असे मुश्रीफ म्हणाले. नगरमधील के. के. रेंजच्या विस्ताराला गावकर्यांचा विरोध वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, ते म्हणाले की, के. के. रेंज विस्तारीकरणाला असणारा शेतकर्यांचा विरोध यापूर्वीच सरकारला कळवला आहे. याप्रकरणाची अधिक माहिती घेण्यात येईल.