नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी शेतकऱ्यांचा सर्वांगाने विकास करत २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सीतारामन यांनी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सोयीसवलती पुरवणार असल्याचीही घोषणा सीतारामन यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांच्या या योजनेसाठी २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूदही त्यांनी केली आहे.
काय आहेत सीतारामन यांनी जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना
1) पंतप्रधान कुसूम योजनेंतर्गत २० लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येईल.
2) देशात १६२ दशलक्ष टन धान्य साठवण क्षमता आहे. आता नाबार्ड याला जीयोटॅग करेल. तसेच धान्य साठवणीसाठी गट आणि तालुका स्तरावर नवी कोठारे बांधली जातील. त्यासाठी राज्य सरकार जमीन देऊ शकते.
3) केंद्राच्या मॉडेल लॉला लागू करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहित करण्यात येईल.
4) पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या १०० जिल्ह्यात व्यापक प्रयत्न केले जातील.
5) स्वयंसहायता गटांद्वारे गावाता साठवण भांडारे उभारली जातील.
6) १५ लाख शेतकऱ्यांना ग्रीड कनेक्टेड पंप सेटशी जोडून घेतले जाईल.
7) शेतकऱ्यांसाठी कृषी उडाण योजना सुरू केली जाईल, ही विमानसेवा कृषिमंत्रालयाकडून दिली जाईल.
8) उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, रासायनिक खतांचा वापर कमी केला जाईल, रासायनिक खतांच्या संतुलित वापरासाठी माहिती दिली जाईल.
9) दूध उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकारकडून योजना चालवली जाईल, २०२५ पर्यंत दुग्धउत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य
10) दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत ५८ लाख एसएचजी बनवण्यात आले आहे. त्यांना अधिक भक्कम केले जाईल.
11) फूड अँड माऊख आजार तसेच पीपीआर आजारांचे २०२५ पर्यंत उच्चाटन केले जाईल.
12) दूध, मांस, मासे यांची साठवण आणि वाहतूक करण्यासाठी विशेष किसान रेल्वे धावणार.
13) फायनान्सिंग ऑन निगोशिएबल वेअर हाऊसिंग स्कीम अधिक मजबूत केली जाईल.
14) देशातील शेतकऱ्यांना सुमारे १५ लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून, त्यासाठी नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
15) नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, जैविक शेतीसाठी एक पोर्टल तयार केले जाईल, ऑनलाइन मार्केट मजबूत बनवले जाईल.
16) सागरी क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, पुढील आर्थिक वर्षांत मत्स्य उत्पादन ३०८ दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य, ३०७७ सागर मित्र तयार केले जातील त्यातून किनारी भागातील तरुणांना रोजगार मिळेल.