बहुजननामा ऑनलाइन टीम – सुरेश रैना आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्स सोडून भारतात परत आला आहे. तो परत आल्यामुळे अनेक अफवा सुरु आहेत. रैना कौटुंबिक कारणामुळे परत आल्याचं चेन्नई सुपर किंग्सने सांगितलं होतं. पण टीमचे मालक श्रीनिवासन यांनी वेगळंच कारण सांगितलं.
रैनाने मंगळवारी ट्विट करत पंजाब पोलिसांकडे अपील केलं. तो म्हणाला, पंजाब मध्ये माझ्या कुटुंबियांसोबत जे काही घडलं ते खूप भयानक होतं. माझ्या काकांचा त्याच वेळी मृत्यू झाला होता. माझी आत्या आणि माझ्या भावंडाना गंभीर दुखापत झाली. काल रात्री मृत्यूशी संघर्ष करत असलेल्या माझ्या भावाचा मृत्यू झाला. माझी आत्या गंभीर परिस्थितीत असून ती व्हेंटिलेटरवर आहे.
रैना म्हणाला की अजूनही आम्हाला समजलं नाही की त्या रात्री नेमकं काय घडलं. मी पंजाब पोलिसांना अपील करतो की त्यांनी याची चौकशी करावी. आम्हाला कमीतकमी हे जाणून घेण्याचाअधिकार तर नक्कीच आहे की त्यांच्यासोबत हे सगळं कोणी केलं. त्या गुन्हेगारांना आणखी गुन्हे करण्यासाठी सोडायला नाही पाहिजे.
सुरेश रैनाच्या कुटुंबियांवर पठाणकोटच्या थरियाल गावात रात्री हल्ला झाला होता. हा हल्ला 19 ऑगस्टच्या रात्री झाला जेव्हा हे सगळेजण घराच्या गच्चीवर झोपले होते. तेव्हा काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केला. या घटनेत रैनाची आत्या आशा देवी गंभीर जखमी झाली आहे. तिचे पती 58 वर्षीय अशोक कुमार यांचा मृत्यू झाला.
रैनाचे आतेभाऊ 32 वर्षीय कौशल कुमार आणि 24 वर्षीय अपिन कुमार गंभीर जखमी झाले होते. या दोघांपैकी कोणाचा मृत्यू झाला याची माहिती रैनाने दिली नाही. सीएसकेचे सीईओ विश्वनाथन यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं की या प्रसंगी संपूर्ण टीम रैनाच्या कुटुंबियांसोबत आहे.