मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सातारा येथील भिवडी गावातील एका कार्यकर्त्यांच्या लग्न समारंभात माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण खवळून निघाले आहे. या दरम्यान,त्या दोघांनाही अश्रू अनावर झाल्याच्या चर्चा रंगवल्या जात होत्या. ‘मात्र ही भेट चुकून झालेली होती. अश्रू अनावर झाले अशा बातम्या निराधार आहेत. उदयनराजेंचा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये,’ असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी दिलं आहे.
शशिकांत शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं की, ‘महादेव शेलार नावाच्या कार्यकर्त्यांचं भिवडी येथे लग्न होतं. त्यावेळी मी तिथे एका बाजूला उभा असताना उदयनराजेंनी येऊन मला मिठी मारली. ‘सॉरी चुकलो’ असं ते दोन वेळा म्हणाले, मात्र मी त्यावर काही प्रतिसाद दिला नाही. तसेच ‘२० वर्षाच्या राजकारणात माणूस कष्ट करुन निवडून यायला जातो. त्यावेळेस आज जर निवडून आलो असतो तर पवारसाहेबांनी खूप मोठी संधी दिली असती. त्याला मुकलो आहे अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.
यावर शशिकांत शिंदे म्हणाले कि, ‘तुम्ही स्वत:चे आणि माझे फार मोठे राजकीय नुकसान केलेले आहे. त्यामुळे आता सॉरी बोलून फायदा नाही. आता त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे अश्रू आले वैगेरे या बातम्या निराधार आहेत. मी माझ्या पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आतापर्यंत मी पार पाडत आलो आहे. शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात काम करत आहे
त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आणि मी माझ्या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे हि भेट एवढ्यापुरतीच मर्यादित होती, असेही शिंदे यांनी म्हंटले आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. यावेळी शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राजेंनी मित्राचं ऐकलं नाही. त्यामुळे निवडणूक काळात हे दोन्ही मित्र पक्के वैरी बनल्यासारखं दिसून आलं. मात्र, दोघांचाही आपल्या-आपल्या मतदारसंघातून पराभव झाला.
Visit : bahujannama.com