संगमनेर : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील तरुण नेते, मंत्री यांच्याशी तरुणाईचा संवाद असा आशय घेऊन मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अवधूत गुप्ते यांनी केलं यावेळी आदित्य ठाकरेंना आगामी महापालिका निवडणुकांत पुन्हा एकदा तिन्ही पक्ष म्हणजेच काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र दिसू शकते का या प्रश्नावर पर्यावरणमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी साकारात्मक उत्तर दिले. मुंबई महापालिका देखील एकत्र लढवणार असल्याचे संकेत यावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आले.
वेगळ्या विचारधारेचे लोक राज्यासाठी एकत्र…
यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, नक्कीच, गेल्या काही काळापासून आम्ही तिन्ही पक्षाचे नेते मिळून काम करतोय. या काळात एक गोष्ट मला जाणवली आहे की, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या पक्षांसोबत काम करणं सोपं आहे. कारण ही आपल्यासारखी लोकं आहेत. हे नेते लोकांचा विचार करतात. आमच्याप्रमाणेच महाराष्ट्राचा विचार करतात. आमच्या तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे, तीन वेगळ्या टोकांचे पक्ष आहेत. पण तरीदेखील तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. राज्यासाठी एकत्र काम करत आहेत. हिच आपल्या देशाची लोकशाही आहे.
सगळी नाती एकत्र आली …
माझ्या आजोबांची (बाळासाहेब ठाकरे) शरद पवारांसोबत खूप घट्ट मैत्री होती. ही सगळी नाती आता जवळ आली आहेत. कौटुंबिक नाती, मैत्रीची नाती एकत्र आली आहेत. विशेष म्हणजे आम्ही अशा वेळी एकत्र आलो आहोत जेव्हा या राज्याला त्याची गरज होती.आमच्या तिन्ही पक्षांमधील नेत्यांचे चांगले ऋणानुबंध होते आणि आहेत. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक होतो, परंतु आमचे जवळचे लोक एकमेकांच्या पक्षात आहेत. पवार कुटुंबासोबतचे आमचे संबंध तर खूपच मजबूत आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबतही आमचे खूप चांगले संबंध होते. त्यांच्यासोबत काम करणं सोपं होतं. ते मुख्यमंत्री असताना आमचा पक्ष विरोधात होता, परंतु कोणतीही कटुता नव्हती. माझी आणि धीरजची मैत्री आहे, माझी आणि रोहितची मैत्री आहे.
आपण स्वच्छ मनाने राहिलं पाहिजे आणि वागलं पाहिजे…
यावेळी आदित्य ठाकरेंना कोणाचा अधिक राग येतो, राज ठाकरे की नारायण राणे? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझे वडील यांना देखील असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. यावर सर्वांना मी माफ केलं असं उत्तर उद्धव ठाकरेंकडून देण्यात येतं असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच मी माफ करण्याइतका मोठा नाही. परंतु राजकारणात राग वैगरे धरायचा नसतो. कोण कसही वागू दे मात्र आपण स्वच्छ मनाने राहिलं पाहिजे आणि वागलं पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.