मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका केली आहे. या विधानामुळे महाविकास आघाडीमधील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी, बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे अशी टीका केली आहे.
मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा ८० टक्के फायदा होणार आहे. तसेच ही कर्जमाफी अंतिम नसून, हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसा-जसा पैसा येईल तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफीबद्दल निर्णय घेतले जाणार आहे असे अब्दुल सत्तार म्हणाले.
आळंदी येथे वारकऱ्यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांनी वक्तव्य केला की, सरकारच्या धोरणांमुळे जे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे ते अगणित आहे. त्याचा आपण अंकात विचार करू शकत नाही. तसेच माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहे. यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, बच्चू कडू ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारची कर्जमाफी त्यांना बुजगावणं असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा खोचक सल्ला सत्तार यांनी यावेळी दिला.