औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. दलित समाजातील कलाकारांनी एकत्र येऊन दलित थिएटर स्थापन करून महाराष्ट्रात एक नाट्य चळवळ सुरू केली होती. ती पुन्हा सक्रिय करण्यासाठी नुकतीच एक बैठक नागसेनवनात घेण्यात आली. त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी मधुसूदन गायकवाड होते.
प्रा. साहेबराव गायकवाड, मधू गायकवाड, प्रा. अविनाश डोळस, प्रकाश त्रिभुवन, प्रा. विजयकुमार गवई, डॉ. सदाशिव पंडित या सर्वांनी मिळून या नाट्य परिषदेची स्थापना ३४ वर्षांपूर्वी केली होती. दलित थिएटरची स्थापन करून सर्व महाराष्ट्रभर नाट्य चळवळ सुरू केली होती. ‘गाव नसलेलं गाव’ ‘थांबा रामराज्य येतंय’. ही नाटके या काळात खूपच गाजली.
अ.भा. दलित नाट्य परिषदेने महाराष्ट्राच्या नाट्य भूमीत एकसे बढकर एक नाटके दिली. ‘थांबा राम राज्य येतंय’ ची ३५० च्या वर प्रयोग झाले. या नाटकाने सर्व महाराष्ट्राला वेड लावले होते. ‘आवर्त, मुल्याटो, सत्यमेव जयते, एक होता राजा, युगयात्रा, नित्याची गोष्ट, वाटा पळवाटा, देव नवरी, आठवणीचे पक्षी, आंबेडकरी जलसा, हा माझा देश व स्वातंत्र्य कंच्या गाढवीनीचं नाव’ ही पथनाट्यही सादर करण्यात आली होती. अशी एकसे बढकर एक नाटके दिली.
या नाट्य परिषदेच्या सदृश्य काही कारणास्तव वेगळे झाल्याने दलित थिएटर नावाच्या संस्थेचा प्रवास मंदावला. पुढे १९८७ ला अ.भा. नाट्य परिषद स्थापन झाली व परिषदेने १० नाट्य संमेलने आयोजित केली. मंदावलेली नाट्य चळवळ पुन्हा जोमाने चालावी यासाठी पुन्हा एकदा नाट्यकर्मींकडून प्रयत्न होताना दिसत आहेत.
या बैठकीस नागपूरचे प्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारी, दादाकांत धनविजय, अशोक जांभूळकर, मुंबईचे प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, के.बी. ब्राह्मणे, आशुतोष नाटकर, विलास गवळी, अशोक गायकवाड, दिलीप म्हस्के, तुळशीराम मोरे, औरंगाबादचे प्रा. प्रभाकर शिरोळे, प्रा. विजयकुमार गवई, प्रा. प्रकाश सिरसाट, प्रा. दिलीप बडे, नामेदव जोगदंड, प्रकाश त्रिभुवन आदींची उपस्थिती होती.