पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने रोजगार संपवला, असा आरोप करत आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीकडून ‘बेरोजगारीचे बारसे’ घालण्यात आलं. अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध ‘आप’ने केला. या आंदोलनाची सध्या पुण्यासह इतरत्र चर्चा सुरु झाली आहे.
पुण्यातील गुडलक चौकात पदवीधर युवकांनी चहा विकून विद्यमान सरकारचा निषेध व्यक्त केला. आम आदमी पक्षाच्या युवा आघाडी युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहे.
मोदी-फडणवीस सरकारची चुकीची धोरणं या परिस्थितीला कारणीभूत आहेत. सरकारी सेवेत हजारो पदे रिक्त असताना शिक्षकभरती व मेगाभारतीचे नुसते आश्वासन देऊन कोणतीच अंमलबजावणी केली नाही. स्कील इंडिया व स्टॅन्डअप योजनांचा फायदा युवकांना होत नसल्याचे दिसून आले आहे. मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे करोडो रोजगार गेले आहेत. विद्यापीठांच्या स्वायत्तेवर गदा आणून युवक-विद्यार्थी यांच्यावर अन्याय केला जात आहे. शिक्षणावर खर्च होत असलेले बजेट या वर्षी देखील कमी ठेवण्यात आले आहे.” असा आरोप यावेळी ‘आप’कडून करण्यात आला.
तसेच, “यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बेरोजगार युवकांसाठी कोणतीही विशेष तरतूद केली नसून त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम मोदी व फडणवीस सरकारद्वारे सातत्याने केले जात आहे. राज्यात एक लाखांवर शासकीय जागा रिक्त आहेत.” असेही ‘आप’ने म्हटले.
सरकार रोजगार संपवत असल्याचा आरोप करत, ‘आप’ने निषेध नोंदवण्यासाठी पुण्यातील गुडलक चौकात मोदी सरकारने जन्माला घातलेल्या बेरोजगारीचे बारसे करण्यात आले. लोकायत, सिव्हिल इंजिनीअर असो., एम पी एस सी स्टुडंट राईटस, विद्यार्थी अभ्यासिका समिती आदी संघटनांनी या आंदोलनाला सहभाग घेत पाठिंबा व्यक्त केला.