नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा अधिकृत जाहीरनामा ‘केजरीवाल का गॅरंटी कार्ड या नावाने पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर केला. या गॅरंटी कार्डमध्ये 10 आश्वासने नमूद केली आहेत, ज्यात पाणी, वाहतूक आणि वीज यासह अनेक बाबींचा समावेश आहे.
केजरीवाल गॅरंटी कार्डमध्ये प्रत्येक घरात पाणी, प्रदूषणमुक्त शहर,महिला सुरक्षा, मोफत वीज (२०० युनिट), भूमिगत केबल, बेकायदा वसाहतींसाठी पायाभूत सुविधा, झोपडपट्ट्या, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, स्वच्छ दिल्ली आणि स्वच्छतागृहे उयांच्यासंबंधी आश्वासने देण्यात आली आहेत. नवीन शाळा उघडल्या जातील आणि यंत्रणा बळकट होईल. असे देखील आश्वासने दिली आहेत.
यावेळी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, येत्या पाच वर्षांत दिल्लीतील लोकांना अत्यंत स्वच्छ व चोवीस तास पाणी मिळेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २०,००० लिटर मोफत पाण्याची सुविधा सुरू करण्यात येईल. दिल्लीत जन्मलेल्या मुलाला बारावीपर्यंतचे शिक्षण विनामुल्य मिळेल.
चांगले आरोग्य उपचार
आरोग्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ‘दिल्लीतील प्रत्येक कुटूंबासाठी मोफत आणि चांगले उपचार करणे ही आमची हमी आहे. आमच्या सरकारनेही या दिशेने बरीच पावले उचलली आहेत. मोहल्ला व पॉली क्लिनिक उघडली जातील. आम्ही संपूर्ण दिल्लीत अशी व्यवस्था करू की दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा मिळतील.
परिवहन
परिवहन व्यवस्थेबाबत केजरीवाल म्हणाले की 11,000 पेक्षा जास्त बसेस रस्त्यावर असतील.500 किमीपेक्षा जास्त मेट्रो मार्ग बांधला जाईल. ते म्हणाले की महिलांना देण्यात येणारी मोफत बस सेवा सुरू राहणार आहे. ते म्हणाले की आम्ही विद्यार्थ्यांना मोफत वाहतुकीची सुविधाही देऊ.
प्रदूषण
प्रदूषणाच्या मुद्दय़ावर केजरीवाल म्हणाले की, 21 कोटीहून अधिक झाडे लावली जातील. मुख्यमंत्री म्हणाले की धूळ माती उडणार नाही, त्याकरिता व्हॅक्यूम क्लिनरने साफसफाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या प्रक्रियेत यमुना ची सफाई देखील केली जाईल
महिला सुरक्षा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बस मार्शलच्या धर्तीवर मोहल्ला मार्शल लावण्यात येतील जेणेकरून महिलांचे संरक्षण होईल. ते म्हणाले की, दीड लाख सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. दीड लाख लावले जात आहेत. आम्ही महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही गय करणार नाही.
घर
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की जिथे झोपडपट्टी आहे तेथे आम्ही पक्की घरे बांधू आणि त्यांना सर्व मूलभूत सुविधांनी सुसज्ज करू. ‘आप’ केजरीवाल गॅरंटी कार्डद्वारे डोर – टू – डोर मोहीम राबवेल आणि गेल्या पाच वर्षात दिल्ली सरकारने केलेल्या कामांचा लेखा जोगा लोकांना देईल, असे सांगण्यात आले. सीएम अरविरंद केजरीवाल यांच्या पक्षाने या कार्डाद्वारे देशाच्या राजधानीतील 35 लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांच्या कर्तृत्व सांगण्याचे लक्ष्य ठेवले आहे.त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचा संपूर्ण जाहीरनामा 26 जानेवारीनंतर येणे अपेक्षित आहे.