मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात सत्ता आल्यास 10 रूपयात जेवणाची थाळी देऊ, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर ही योजना सुरू केल्यानंतर विविध अटी आणि शर्थींमुळेच ती चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा अटींमध्ये वाढ करून आधार कार्ड आणि फोटो बंधनकारक केल्याने योजनेवर टीका होत आहे. मुंबईत 15 ठिकाणी ही योजना सुरु होत असून त्यासाठी खास सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामध्ये आयडेंटीसाठी आधार कार्ड आवश्यक असणार आहे.
योजनेच्या अटी शर्थींचा भाजपाने निषेध केला आहे. यावर टीका करताना भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटले आहे की, 10 रुपयात जेवणाची थाळी देताना खूप अटी शर्थी आहेत, गरीबाला जेवू घालताय की त्यांची थट्टा करताय. बिनशर्त सर्वांना जेवण मिळालेच पाहिजे. बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि उलट करायचे. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांच्या कर्जमाफी सारखीच शिवभोजन योजना फसवी आहे. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणार्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केली आहे. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे, असे कदम यांनी म्हटले आहे.
शिवभोजन योजनेसंदर्भात माहिती देताना गुरूवारी अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले की, राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देणार्या या योजनेचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, शिवभोजन योजनेतील थाळीत 2 चपाती, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ आणि भात मिळणार आहे आणि ते ही दुपारी 12 ते 2 या दोन तासातच हे जेवण मिळेल, अशा अटी होत्या. आता आधार कार्ड आणि फोटोची अटही घालण्यात आल्याने पुन्हा एकदा या योजनेवर टीका होत आहे. सरकाने म्हटले आहे की, अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना गरीबांसाठी असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी अशाप्रकारे नियमअटी लावण्यात येत आहेत. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी तीन महिन्यांसाठी सुमारे 6 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद मंत्रिमंडळाकडून करण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com