बहुजननामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे अनेक चित्र-विचित्र घटना घडत असून त्याची चर्चा होत आहे. अशीच एक घटना बिहारमधील बक्सर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये घडत आहे. मांजवरी क्वारंटाइन सेंटरवरील एक 23 वर्षीय तरुण सध्या त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे चर्चेत आला आहे. राजस्थानवरुन बिहारमध्ये परतलेला हा तरुण दिवसाला 40 पोळ्या आणि 8 ते 10 प्लेट भात खातो. सकाळ संध्याकाळ असा दोनवेळा त्याला ऐवढे अन्न लागत आहे. मात्र अधिकार्यांना या व्यक्तीबद्दल समजले तेव्हा त्यांच्या या गोष्टीवर विश्वास बसला नाही. म्हणून त्यांनी स्वत: या केंद्राला भेट देऊन खातरजमा करुन घेण्याचा निर्णय घेतला आणि ते थक्क झाले आहेत. अनुप ओझा असे तरुणाचे नाव आहे.
अनुपच्या खाण्याच्या सवयीबद्दल जाणून घेण्यासाठी अधिकारी दुपारच्या जेवणाच्या वेळी केंद्रावर पोहचले. त्यावेळी अनुप खरोखरच एकावेळी 10 जणांना पुरेल इतके खाणे खात असल्याचे पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. बिहारमध्ये लोकप्रिय असणारा स्वयंपाक क्वारंटाइनमधील व्यक्तींसाठी बनवली जात असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. अनुपने एकट्याने 85 लिट्टी खाल्ल्याचे आम्हाला समजले. एका व्यक्तीसाठी एवढ्या पोळ्या (चपात्या) बनवून आता येथील स्वयंपाकीही कंटाळला आहे. या सर्व तक्रारी मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष येऊन पहाणी करण्याचे ठरवले अशी माहिती प्रभाग विकास अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.
त्यामुळे सध्या हे केंद्र सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या केंद्रावर अगदी थोड्या संख्येमध्ये व्यक्ती असल्या तरी ओझा याच्या अती खाण्याच्या सवयीमुळे केंद्रावर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दहा व्यक्तींना पुरेल एवढे अन्न एकच व्यक्ती खात असल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे समजल्यानंतर अधिकारी संभ्रमात पडले आणि त्यांनी स्वत: जाऊन काय प्रकरण आहे हे जाणून घेण्याचा निर्णय घेतला.