बहुजननामा ऑनलाइन टीम – भाडेपट्ट्यावर दिलेली शेतीजमीन करार संपूनही परत मिळत नसल्याने भिवरवाडी (ता. करमाळा) येथील एका शेतक-याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी शेतक-यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. यावरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुबारक मेहबुब मुलाणी (रा. भिवरवाडी, ता. करमाळा) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. मल्हारी आरकिले, नारायण आरकिले व दत्तात्रय आरकिले (सर्व रा. भिवरवाडी, ता. करमाळा) अशा तिघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मृताचा मुलगा शब्बीर मुबारक मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुबारक मुलांणी यांनी आरोपींना भाडेपट्ट्यावर शेतजमीन करार करून दिली होती. मात्र करार संपल्यानंतरही आरोपीनी मुलानी यांना शेती परत करण्यास नकार देत होते. 25 जानेवारी रोजी मुबारक हे शेतात जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यामुळे मुबारक मुलांनी यांनी सोमवारी (दि. 25) विषारी प्राशन केले. तर बुधवारी (दि. 27) रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मुलांणी यांनी त्या चिठ्ठीत लिहलेला मजकूर…
भिवरवाडी येथील सर्व्हे नंबर 436 येथील आठ एकरापैकी चार एकर शेतजमीन भाडेपट्टीवर देण्यासाठी जबरदस्ती केली. सह्या न केल्यास तुला रान करून देणार नाही, तर तू चार एकर कर, आम्हाला चार एकर दे, असे लिहून घेतले. नंतर पाच – दहा हजाराने 59 हजार रुपये दिले. याबाबतचे हस्तलिखित स्वतः दत्तात्रय आरकिले याने स्वतःजवळ ठेवले असल्याचेही त्यात नमूद केले आहे. तर चार एकर मी स्वतः वहिवाटत होतो. त्यावर बॅंक कर्जाची नोंदही आहे. या प्रकरणात कोर्टाचीही त्यांनी दिशाभूल करून निकाल लावून घेतले असल्याचे पत्रात उल्लेख केला आहे. तर मृत्यूस जबाबदार म्हणून मल्हारी, नारायण व दत्तात्रय आरकिले हे जबाबदार आहेत, अशी नोंद या पत्रात केली आहे.