नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातील बोगोडजवळ सोमवारी रात्री बस आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात ९ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, ही बस कोटा जिल्ह्यातून भिलवाडा बस डेपोच्या दिशेने जात होती. तर दुसरीकडे बोलेरो मधील मंडळी एका विवाह सोहळ्यावरून घरी परतत होती. यावेळी चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात झाला. जखमींना भीलवाडा येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 5 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. 15 जण जखमी झाले असून ते खंधारा गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
अशोक गेहलोत यांनी व्यक्त केले दुःख
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या भीषण अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच जखमींना योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी एक ट्विट केलं आहे.