मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या संकटकाळात महागाई भत्त्यावरून यंदा केंद्रीय कर्मचारी (Central employees) तसेच निवृत्तिवेतनधारकांच्या (pensioners) पदरी निराशा पडली आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे पेन्शनर्स आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना यंदा महागाई भत्ता जुन्या दरानेच मिळणार आहे.
पुढील वर्षी जुलैमध्ये महागाई भत्त्यात ( Dearness Allowance ) मध्ये वाढ करण्यावर केंद्र सरकार विचार करू शकते. 50 लाख केंद्रे सरकार कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांवर याचा परिणाम होणार आहे. कोरोना काळात आलेले आर्थिक संकट पाहता जुलै 2021 पर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness allowance) कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
साधारणपणे 1 जानेवारीपासून केंद्र सरकार महागाई भत्त्यामध्ये वाढ देते. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढण्याची प्रतीक्षा करत होते. कारण सरकारने महागाई भत्त्यावर सवलत जाहीर केल्यास कर्मचाऱ्यांना अधिक पगार मिळणार, तर पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढीस मंजुरी दिली होती. सर्वसाधारणपणे वाढत्या किमतीत भरपाईसाठी वर्षातून 2 वेळा डीए संशोधन केले जाते. सरकारच्या खर्चात कपात करण्याचा हा एक मार्ग आहे. यामुळे केंद्र सरकारच्या खर्चात कपात होणार असली तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.