मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मागील साठ वर्षाच्या काळात राज्यावर २ लाख ६९ हजार कोटी रुपये कर्ज होते. मात्र युती सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात राज्यसरकारवर ५लाख ३हजार कोटींचा डोंगर झाला असून २०१४च्या तुलनेत ते आता आज दुप्पट झाले आहे . आता पुरवणी मागण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून बजेटच्या 5 ते 10 टक्क्यावरून ते 13 टक्क्यांवर पोहचले आहे. त्याच्या तुलनेत मात्र उत्पन्न वाढताना दिसत नाही. राज्य पूर्णपणे कर्जाच्या विळख्यात गेलं असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर जवळपास 50 हजार रुपये कर्ज आहे आणि दिवसेंदिवस ते वाढत जाणार आहे .असे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना सांगितले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरवात करताना ते बोलत होते.
राज्याचे बजेट हे 3 लाख 67 हजार 280 कोटींचे होते . सरकारने वर्षभरात त्यामध्ये ज्या पुरवणी मागण्यांतून 36 हजार 500 कोटींची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बजेट 4 लाख 3 हजार 335 कोटींचे झाले आहे. सरकारने गेल्या साडेचार वर्षात 1 लाख 92 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यामुळे महसुली तुट वाढत चालली असल्याचे भुजबळ म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळात राज्यावर 2 लाख 69 हजार कोटींचे कर्ज होते ते आता तब्बल 5 लाख 3 हजार कोटी रूपयांवर गेले आहे. याच काळात राज्यातील प्रत्येक नागरिकावर 28 हजार रूपयांचे कर्ज होते ते आता गेल्या साडेचार वर्षात जवळपास 50 हजार रूपयांवर गेल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.