बहुजननामा ऑनलाईन
कोरोना संकटामुळं अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. अनेकांना पगारकपातीलाही सामोरं जावं लागत आहे. अशात घर चालवण्यासाठी बहुतेकांना तारेवरची कसरत करावी लागली. या सगळ्या परिस्थितीमुळं 36 टक्के नोकरदार मानसिक समस्यांच्या विळख्यात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. याशिवाय 50 टक्के सामान्य नोकरीतील अस्थिरतेमुळं चिंताग्रस्त आहेत असंही दिसून आलं आहे.
दिवसागणिक वाढणाऱ्या या तणावाला सर्वाधिक म्हणजे 40 टक्के आर्थिक गुंतवणूक आणि करिअरचा घसरता आलेख कारणीभूत असल्याचं दिसून आलं आहे. या अभ्यासासाठी 30,40 आणि 50 वयोगटातील सामान्यांशी संवाद साधण्यात आला आहे. ज्या नोकरदारांचं उत्पन्न 5 लाखांहून कमी आहे. त्यांना सर्वाधिक मानसिक समस्या आहेत. या अहवालातील विशेष बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीनं मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेतलेले नाहीत वा आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांविषयी समुपदेशकांकडे संवाद साधलेला नाही.
कोरोनामुळं सुरू असलेल्या वर्क फ्रॉम होम जीवनशैलीतही 44 टक्के नोकरदारांना सतत चिंता भेडसावत असते. तर 26 टक्के नोकरदार या पद्धतीला कंटाळले असल्याचं समोर आलं आहे. याव्यतिरीक्त 48 टक्के नोकरदारांना असाईनमेंट, टार्गेट आणि टास्कमुळं सतत अस्थिरतेची भावना जाणवत असते. दुसरीकडे कोरोनामुळं बेरोजगार झालेल्यांमध्ये तणावाचे प्रमाण 61 टक्के असून क्रोधाचे प्रमाण 42 टक्के आहे.
मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या
आपल्याकडे शारीरिक आजारांसाठी लाखोंनी पैसे खर्च करण्यात येतात. मात्र मानसिक आरोग्य स्विकारलंही जात नाही. आता तरी ही परिस्थिती बदलायला हवी. सध्याचा काळ मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत कठिण आहे. त्यामुळं आपलं किंवा आजूबाजूच्या व्यक्तींचं मानसिक स्थैर्य नीट नसेल तर वेळीच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञांना भेटून सल्ला घेणं आवश्यक आहे.
तणावाची प्रमुख कारणं आणि त्याचं प्रमाण
– 32 टक्के कौटुंबिक आरोग्य
– 13 टक्के लहानग्यांचे शिक्षण
– 17 टक्के नातेसंबंधांमधील समस्या
– 25 टक्के कुटुंबाचे मानसिक आरोग्य
– 18 टक्के सामाजिक अंतर/अलगीकरण
– 22 टक्के कार्यालयीन प्रगती/अपरायजल