बहुजननामा ऑनलाइन टीम – सांगली : राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनुसार शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. याला वर्ष उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता यावर शिवजयंतीपर्यंत निर्णय न झाल्यास शिवछत्रपती पुरस्कार परत करण्याचा निर्णय राज्यातील ३२ खेळाडूंनी घेतला आहे. काही खेळाडूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू एकत्र आले आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्य सरकारला दिले.दरम्यान, या प्रकारामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडू क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकाविण्यासाठी प्रयत्न करत असतो. सर्व कसोट्यांतून गेल्यानंतर खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळतो. हा सन्मान खूप मोठा आहे पण एकदा मैदान सोडले की आर्थिक कोंडी होते. सद्यस्थितीला राज्यातील अनेक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आज रंगकामासह शेतमजुरीची कामे करीत आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्र व क्रीडा चळवळीत बाधा येत आहे. या खेळाडूंनी त्यांच्या पात्रतेनुसार शासकीय सेवेत नोकरी देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मागणी केल्यानंतर गेल्या वर्षी शिवजयंतीस शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, अद्याप एकालाही नोकरी मिळालेली नाही. याला वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे आता यंदाच्या शिवजयंती म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर २० फेब्रुवारीला राज्यातील ३२ खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार परत करणार आहेत.