बहुजननामा ऑनलाईन टीम – अन्न व नागरी पुरवठा विभागाने जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, संयुक्त शिधापत्रिकांचे विभक्तीकरण करणे व नवीन शिधापत्रिका तातडीने देण्यासाठी विशेष मोहीम राबवून ही कार्यवाही ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आले आहे. यामुळे आता प्रलंबित असणाऱ्या रेशनिंगकार्डची प्रकरणे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या पूर्वीच्या काळासारखे कुटुंब एकत्रित राहत नसल्याने प्रत्येकांना त्यांच्या त्यांच्या नावावर असणारे रेशनिंगकार्ड असणे आवश्यक आहे. पूर्वी कुटुंब एकत्र असल्याने कोणा एकाच्या नावावर रेशनिंगकार्ड असल्याने जर आता कुटुंब विभक्त झाल्यास अन्य व्यक्तींच्या नावावर रेशनिंगकार्ड करण्यासाठी अनेकजण पुरवठा विभागाकडे अर्ज करत असतात. त्याचबरोबर असे अनेक जण असतात ज्यांच्या शिधापत्रिका जीर्ण झाल्या आहेत, फाटल्या आहेत, तर काही जणांचे शिधापत्रिका काही कारणाने वाया गेल्या आहेत अशा लोकांनाही शिधापत्रिकेचीही गरज असते, त्यामुळे तेही नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज करत असतात. तर काही जण रेशनिंगकार्डवरील नावे कमी करण्यासाठी, किंवा वाढवण्यासाठी अर्ज करत असतात.
या बाबतीत अर्ज करण्यासाठी गेल्यांनतर सर्वसामान्यांना आपले काम लवकर होईल की नाही याबाबत शंका निर्माण होते कारण तेथील गर्दी, कागदांचे गठ्ठे पाहून मनात शंका निर्माण होते. यामुळे येथील कर्मचारांना काम करता करता नाकीनऊ येतात. त्यात प्रत्येक दिवशी अनेक नवीन अर्ज शिधापत्रिकेसाठी येतात. या कारणांमुळे तातडीने शिधापत्रिका वितरण करणे शक्य होत नाही. यामुळे ही प्रकरणे प्रलंबित राहतात.
यासंदर्भात विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दाखल खुद्द मुख्यामंत्र्यांनीच घेतली. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिधापत्रिका वितरणावर चर्चा झाली. मुख्यामंत्र्यांनी त्या बैठकीत केलेल्या सूचनेनुसार संबंधित शिधापत्रिका तातडीने संबंधितांना मिळाव्यात, यासाठी विशेष मोहीम राबवून ही कार्यवाही ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.