भुसावळ : बहुजननामा ऑनलाईन – भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. भाजपमधील खडसे समर्थक नेते आणि कार्यकर्ते भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरु लागले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठी गळती लागल्याचे पहायला मिळत आहे. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या खडसेंविरोधात ईडीची चौकशी सुरु झाली. त्यानंतर खडसेंनी भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
भुसावळमधील 31 आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये 18 विद्यमान आणि 13 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. जळगाव येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून नगरसेवकांचा सत्कार केला.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित राहिलो. प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या हस्ते भुसावळ येथील भाजपच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/PqMcjZBQNM
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 13, 2021
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी नगरसेवक व आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानले जात आहे. यापूर्वी भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजप हा बहुजनांचा पक्ष आहे अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना प्रतिसाद मिळायला लागला त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
2014 नंतर पुन्हा भाजपची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, कामगारांना युनियन करता येणार नाही. देशातल्या कोणत्याच कामगाराला आपल्या हिताचे संरक्षण करण्याकरिता कायदे करता येणार नाहीत, अशी व्यवस्था मोदी सरकारने केली असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.