मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा तोंडावर आल्याने राज्य सरकारने मेगाभरतीसाठी जाहिरात काढली आहे. त्यामध्ये महिलांसाठी 30 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षित जागांमधून 2406 पदे महिलांची भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये हलके वाहन चालविण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार असून महिलांसाठी उंचीची अट शिथिल करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली.
सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी आज अखेर 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. परीक्षेअंती ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत एक वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रीतसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकणार आहेत, असे रावते म्हणाले.
8 हजार 22 चालक-वाहकांची भरती
महामंडळामार्फत राज्यात सध्या 8 हजार 22 इतक्या चालक तथा वाहक पदाची भरती सुरू आहे. यापैकी दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांमध्ये 4 हजार 416 तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 3 हजार 606 इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत 8 फेब्रुवारी रोजी संपणार होती. इतर जिल्ह्यांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी 24 फेब्रुवारी रोजी संबंधित जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे. महामंडळामार्फत नुकतीच 21 आदिवासी युवतींची बसचालक पदावर भरती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील होतकरू आणि गोरगरीब तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे. यामध्ये अनेक युवतीही एसटीच्या नोकरीसाठी पुढे येताना दिसत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करीत आहे, असेही रावते यांनी सांगितले.